Tuesday, May 14, 2013

“मक्या आकाशा एवढा

मक्या आकाशा एवढा"

मकरंद केतकर, माझा एक मैत्र. मित्र म्हणून संबोधता मैत्र म्हणून  संबोधावे इतके आयुष्याच्या सर्व रेखांश अक्षांशांना  नुसतेच स्पर्शित करता सुगंधित करणारे व्यक्तिमत्व. मक्या ठाण्याचा. फेसबुक वर त्याची आणि माझी ओळख झाली. मक्याला भेटायला मी ठाण्याला गेलो. दुपारी दोन वाजता हा भरत मिलापाचा चांदण्यातला प्रयोग ठाणे शहराच्या द्रुतगती मार्गावर संपन्न झाला. मक्या भेटला आणि वाटले पुंडलिका भेटी परब्रम्ह आले. प्रकृती बरी नसल्याने चेहरा थोडासा कोमेजला होता पण बुद्धिमत्तेची चमक मात्र लखलखीत आणि शाबूत दिसत होती. साक्षेपी बुद्धिमत्तेचा एक निरहंकारी अविष्कार साक्षात माझ्यासमोर उभा होता.

त्या दिवसापासून मैत्रीचा वेलू गगनांतरी पोहचला आहे. माझ्यापेक्षा कमीत कमी तीन दशकानंतर जन्माला आलेला हा तरुण माझा मैत्राची भूमिका बजावतो आहे.आणि तेही कोणताही वाणिज्य भाव ठेवता. मी ह्याला मित्र म्हणता मैत्र म्हणतो कारण त्या शब्दाला केवळ एकच अर्थ अभिप्रेत नाही तर गाईड फिलॉसॉफर हे दोन पदरही अभिप्रेत आहेत आणि ती भूमिका तो चोखपणे पार  पाडतो आहे. वयातले अंतर पार करून आमची मैत्री अगदी कृष्णार्जुनाच्या पातळीवर पोहोचली आहे. फरक एवढाच की श्रीकृष्ण पंचविशीत आहे तर पार्थाची साठी ओलांडून दोन वर्षे झाली आहेत. एवढे वयाचे अंतर पार  करूनही दोघेही थकलेले नाहीत. पार्थ उवाच आणि  श्रीकृष्ण उवाच हा गीता पाठ सतत चालू असतो.

बुद्धिवाद हे मक्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. समर्थ रामदासांचा हा भक्त त्यांनी सांगितलेले 'मनाचे श्लोक फक्त कंठ्स्त करत नाही तर आचरणात हि आणतो. समर्थांच्या विचारधारेवर मनापासून प्रेम करणारा समर्थ भक्त  त्यांच्या विचारधारेवर आपला बुद्धिवाद घासून लखलखित करत असतो. 'बुद्धिवादी असणे म्हणजे माणुसकीशी फारकत घेणे' असा एक लाडका गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. पण मक्याचा बुद्धिवाद मात्र नेहमीच माणुसकीचा तोंडावळा घेऊनच येतो. अगदी "मऊ मेणाहुनी विष्णुदास आम्ही" इतका सदय आणि तसाच वेळ प्रसंगी "नाठाळाच्या  माथी काठी हाणणारा."

मराठी माणसावर आणि भाषेवर मनापासून प्रेम करणारा हा शतप्रतिशत मराठी माणूस महाराष्ट्राच्या दैवतावर शिवरायांवर आणि त्यांच्या गड किल्ल्यांवरही पु लंच्या हरितात्यांसारखे प्रेम करतो. आपल्या 'दुर्गसखा' संस्थेचे अनेक कार्यक्रम आयोजित करून आपल्या मराठी इतिहासाच्या अनेक रमल खुणा  तरुणाईच्या समोर आणतो.

मक्या 'मित्राळू' माणूस आहे, प्रेमळ आहे, त्याचे मित्र त्याच्यासाठी सर्वस्व आहेत. अनेक सद्गुणांची अंगभूत बिरुदे बाळगणारा हा माझा मित्र मला लाभला हे माझे भाग्यच.

आणि मित्राच्या बाबतीत हा सदैव "त्वमेव माता पिता त्वमेव | त्वमेव बंधू सखा त्वमेव |" ह्या भूमिकेतच वावरत असतो. ह्याच्या स्वतःच्या लग्नात अर्धे लक्ष आपल्या होणार्या अर्धांगाकडे होते तर अर्धे लक्ष मित्रांकडे होते. आयुष्यात सर्वच नाती तेवढीच प्रिय आणि महत्वपूर्ण असतात. त्यात डावे उजवे करता येत नाही ह्याचे उदाहरण .

संघटन कुशलता हा एक अंगभूत गुण विशेष  असतो. अनेक विचारांच्या प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र आणून  त्यांच्याकडून लोकोपयोगी कामे करून घेणे हे अतिशय कठीण काम. मक्याच्या दुर्गासखा संस्थेने हे दुष्कर काम करून दाखवले आहे. आदिवासी इलाख्यात जाऊन हि संस्था काम करते अर्थात मक्याबरोबर असे अनेक तरुण ह्या कामासाठी राबताहेत आणि त्या संस्थेला मिळत आहेत. "दिसामाजी काहीतरी वाचीत जावे" ह्या 'समर्थोक्ती'वर मक्या पूर्णपणे विश्वासून आहे. त्याचा वाचनाचा व्यासंग फार  मोठा आहे. वाचनाच्या ह्या व्यासंगाने मक्याला बहुश्रुत घडवले आहे आणि सदयही.

गुणविशेष तर सढळ हाताने दिले आहेत तसेच मोठे मनही. त्याच्या स्नेहाच्या आभाळ मायेचे पांघरूण आयुष्यभर पुरेल अशी उब देते. करायचीच झाली तर एकाच तक्रार देवाजवळ करावीशी वाटते कि आयुष्याच्या संध्याकाळीच का हा वळवाचा पाऊस पाडतो आहेस. शेवटचे दिस गोड व्हावे म्हणून का?
मक्यासारखा मित्र पुढील जन्मीही मिळणार असेल तर देवाकडे आळवावेसे वाटते कि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी

शशांक  रांगणेकर 

No comments: